प्रतिनिधी | बदनापूर
येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहे. या वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक तीनमध्ये बारावीत शिक्षण घेणाऱ्या भिल्ल समजाच्या मुलीने आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला. दरम्यान, सुसाईड नोट न सापडल्याने त्या मुलीने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गुरुवारी दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात मृत विद्यार्थिनीच्या पार्थिवावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
ज्योती संजय सुरासे (वय १७ रा. किन्होळा ता. बदनापूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
बदनापूर येथील एका महाविद्यालयात ती बारावीचे शिक्षण घेत होती. मात्र राहायला ती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वस्तीगृहात होती. मात्र त्या मुलींनी तिला रोखले असता तिने आपण गंमत करीत असल्याचे सांगितले. मात्र नंतर त्या मुली रूममध्ये नसताना तिने रात्री साडेनऊ वाजता आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत तात्काळ बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत यांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर फौजदार कैलास दांडगे, पोलिस मुख्य जमादार बाबासाहेब जऱ्हाड, पोलिस जमादार रियाझ पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्या मुलीच्या मृतदेहाला खाली काढून पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तिथे गुरुवारी दुपारी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही, हा प्रकार घातपाताचा असू शकतो, या संदर्भात सखोल चौकशी होत नाही, तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा मुलींच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी आपण या घटनेची सखोल चौकशी करू, असे आश्वासन दिल्याने मुलीचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
या वस्तीगृहात शंभर मुली राहू शकतात. यापैकी ९२ मुलींना वस्तीगृहात प्रवेश देण्यात आला आहे. यापैकी ७५ मुली नियमित या वस्तीगृहात राहतात. मात्र बुधवारी (ता. पाच) केवळ ४० मुली उपस्थित होत्या. मुलांच्या या वस्तीगृहात एका खोलीत तीन मुली राहू शकतात, असे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय सुरक्षारक्षक आणि महिला गृहपाल या वस्तीगृहावर लक्ष ठेऊन असतात. तसेच सीसीटिव्ही कमेऱ्यामार्फत देखील वस्तीगृहावर नजर ठेवण्यात येते. एव्हढे सारे साधन असताना त्या मुलीने आत्महत्या केली कशी? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. अर्थात या घटनेच्या संदर्भात अद्याप कुठलेही ठोस कारण कळू शकले नाही. मात्र प्राथमिक अंदाजवरून हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे दिसून येते. दरम्यान, या बाबत पोलिस निरीक्षक सुदाम भागवत आणि सहायक पोलिस निरीक्षक स्नेहा करेवाड कसून चौकशी करीत आहेत. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गवई आणि सोबतच्या दोन मुलींचा जवाब नोंदविला आहे.







